कोल्हापूर : ‘महाराष्ट्राच्या इतिहासात महात्मा फुलेंनी सुरू केलेली सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. वेदोक्त प्रकरणातून त्यांना सामाजिक विषमतेची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी बहुजनांवर होणारा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचे स्वरूप मौलिक, बहुमुखी आणि विविधांगी होते,’ असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. बहुजनांना आपल्या दरबारी नोकऱ्या दिल्या. शाळा, वसतिगृहे सुरू केली. त्याद्वारे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोल्हापूर संस्थानच्या आर्थिक विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. शाहू महाराज कलाप्रेमी होते. अनेक कलांना त्यांनी आश्रय दिला,’ असेही डॉ. होनगेकर यांनी सांगितले.
या वेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी रवी पाटील याने शाहू महाराजांविषयी आपले विचार मांडले. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. मंजुश्री घोरपडे यांनी केले. डॉ. सिद्धार्थ कट्टीमनी यांनी आभार मानले. या वेळी डॉ. माधवी चरणकर, सदानंद दुर्गुळे, आर. जी. चौगुले, डी. एम. कांबळे, के. एन. मोरे, संभाजी पाटील आदी मान्यवरांसह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.